कामठी- जगातील प्रत्येक शोषित, वंचित आणि पीडित समुदायाचा सन्मानाचा उद्घोष म्हणून ‘जय भीम’ हा नारा मोठ्या गर्वाने उच्चारला जातो. या नाऱ्याचे जनक बाबू हरदास एल. एन. असून त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ कामठी येथील हरदास स्मृती स्मारक, हरदास घाट, कन्हान नदी येथे दरवर्षी १५ जानेवारीला स्मृती मेळावा संपन्न होतो. या मेळाव्याला यावर्षी ८५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यासाठी समस्त जनतेद्वारे कन्हान नदीवर बाबू हरदास एल. एन. यांच्या स्मृतींना मानवंदना दिली जाणार आहे. सकाळी ११.०० वाजता मोटर स्टैंड येथील बाबू हरदास यांच्या पुतळ्यावर विशेष मानवंदना देण्यात येईल. दरम्यान कामठीच्या विविध ठिकाणांवरून पारंपारिक आखाडा, लेझिम पथक व समता सैनिक दलाची हरदास स्मृती स्मारक, कन्हान नदी पर्यंत मिरवणूक निघेल. दुपारी २.०० वाजता आंबेडकरी ऐक्य सम्मेलनाला सुरुवात होईल. सोबतच ३.०० वाजता पासून प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ४.०० वाजता बाबू हरदास एल. एन. यांच्या स्मारकावर समता सैनिक दलाच्या नेत्तृत्वात समस्त जनता, महार बटालियन व वकिल संघाच्या उपस्थितीत सलामी देण्यात येईल.
दरम्यान, स्मृती स्मारक परिसरात बाबू हरदास एल. यांच्या जीवनावर आधारीत चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, तरुणांना बाबू हरदास यांच्या जीवन कार्याची माहिती मिळावी म्हणून ‘जय भीम प्रवर्तक, बाबू हरदास एल. एन. संक्षिप्त सचित्र जीवनी’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात येणार आहे. परिसरामध्ये सिकलसेल चाचणी शिबिराचे देखिल आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण कार्यक्रमासाठी प्रशासनाने कंबर कसली असून कामठी व कन्हानच्या नगर परिषदेने येणाऱ्या अनुयायांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. सोबतच पोलीस प्रशासन सज्ज असून एम. एस. ई. बी. व कामठी कॅन्टोमेंट बोर्डाने सर्व आयोजनाचे चोख व्यवस्थापन केले आहे तर या मेळाव्यात मोठ्या संख्याने सहभागी होण्याचे आवाहन भदन नागदिपकर, प्रशांत नगरकर संदीप रामटेके तसेच कामठीतील विविध सामाजिक व शैक्षणिक संघटनाच्या वतीने करण्यात आले आहे .










